चिपळूणमध्ये बांधकाम कामगारांना मदतीचा हात

- योजनांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई : ना. उदय सामंत
रत्नागिरी : कामगार विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. चिपळूणमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य, सुरक्षा संच आणि धनादेशांचे वितरण केले.
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तहसीलदार प्रवीण लोकरे, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, नगरपालिका मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अनेक अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी बोलताना कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “कामगारांमुळेच राज्याचा विकास शक्य झाला आहे. त्यांच्या कल्याणासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे.” मात्र, काही ठिकाणी कामगार योजनांच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या तक्रारी त्यांना मिळाल्या. अर्ज भरण्यासाठी किंवा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही लोक पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची नावासह तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तक्रार प्राप्त झाल्यास, अशा प्रवृत्तींवर कठोर पोलीस कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कोणतीही परिस्थितीत बंद होणार नाही.
डॉ. उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी.
कामगार विभागाच्या योजनांची माहिती देताना डॉ. सामंत म्हणाले, “या योजना केवळ सुखातच नव्हे, तर दुःखातही कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देतात. अपघातात जखमी झाल्यास किंवा कामगाराचा मृत्यू झाल्यास या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते.” आतापर्यंत दहा हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सर्वसामान्यांसाठी असलेल्या या योजनांची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याची योजना सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, जिल्ह्यातील एक लाख महिलांना कर्करोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, या लसीमुळे ९२ टक्के महिलांना कर्करोगाचा धोका टळतो. यासाठी ९ ते १४ वयोगटातील ५० हजार मुलींना लस देण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या कल्याणासाठी असलेल्या या योजनांना सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अंमली पदार्थांच्या धोक्याबद्दल बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “पुढच्या पिढीला या विळख्यातून वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी नव्वद दिवसांचे विशेष अभियान राबवून अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांचे मूळ उद्ध्वस्त केले जाईल.”
कार्यक्रमादरम्यान, उपस्थित लाभार्थ्यांना विविध योजनांचे धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त श्री. आयरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कामगार विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.