रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या
इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा हंगामात गुंतलेल्या बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी पहाटे ते सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. आंबा बागायतदारांची यामुळे धावपळ उडाली आहे. कडाक्याच्या उन्हातच अचानक अवकाळी पावसाचे ढग जमा होऊन सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत. आता तर अनेक ठिकाणी भूमिगत विजवाहिन्या टाकलेल्या असताना थोड्याशा वादळ वाऱ्यात देखील वीज पुरवठा का खंडित केला जातो, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून विचारला जात आहे