रत्नागिरीला अवकाळी पावसाचा दणका

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहर परिसरासह जिल्ह्याच्या अन्य काही भागातही अवकाळी पाऊस झाला. दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास मालगुंड-गणपतीपुळे परिसरासह काही तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. गणपतीपुळे परिसरात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्याआधी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. खंडित झालेला हा विद्युत पुरवठा गुरुवारी पहाटे चार वाजून 37 मिनिटांनी पुन्हा सुरू झाला.
हवामान खात्याने वादळासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन दिवस अवकाळी पावसाचे ढग आकाशात जमा झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जवळपास पंधरा मिनिटे पाऊस झाला. अचानक ऊन गायब होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.