संगमेश्वर तालुक्यातील बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच वाटप

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. कामगारांच्या साहित्य वाटपात कुणी गैरप्रकार करत असेल आणि तशी तक्रार आल्यास चौकशी करुन त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, जिथं सात महिन्यांत १० हजारावरुन ५० हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, जिल्ह्यातील १ लाख महिला-भगिनींना भविष्यामध्ये कर्करोग होऊ नये म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून मोफत लस देण्याचा उपक्रम पुढील महिन्यापासून सुरु करणार आहे. त्याचबरोबर अंमलपदार्थापासून नवीन पिढी दूर राहिली पाहिजे, यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी काम केलं पाहिजे, असं आवाहनही यावेळी डाॕ सामंत यांनी सांगितले.
सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी स्वागत करुन प्रास्तविक केले. कार्यक्रमास तहसीलदार अमृता साबळे, राहुल पंडित, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, जि.प. चे माजी सभापती बाबू म्हाप, प्रमोद पवार, सचिन मांगले, सनी प्रसादे, प्रसाद सावंत, देवरुख नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, माजी नगरसेवक वैभव पवार, मुख्याधिकारी श्री. विसपुते यांच्यासह नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.