उरण-नेरुळ आणि उरण-बेलापूर रेल्वे सेवा समस्यांच्या विळख्यात

उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण- नेरुळ तसेच उरण – बेलापूर लोकल सेवा १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला. उरण चा औद्योगिक विकास झाल्याने नोकऱवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवा सुरू झाली त्यामुळे उरणकरांचा प्रवास अति जलद झाला प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे.
लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब सुरु करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही मागणी प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉ. नितीन दिघे यांनी केले आहे.
हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा अशी विनंती सर्व प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे यांनी केले आहे.
उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी याला कारण उरण, बामन डोंगरी ,खारकोपर एकंदर सर्वच स्टेशन वरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हि मागणी जोर धरू लागली आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब,चाकरमानी मुंबई नवी मुंबई येथे घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरने जाहीर केले होते लोकलसेवा प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या जातील ,पण या त्यांच्या भुलथापा आहेत हे आता प्रवाशांच्या लक्षात आले आहे. कामाला जाणेयेणे सोयीचे व्हावे म्हणून बहुतेक नोकरवर्गाने आपली कमाई, कर्ज काढून उरण नेरुळ मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडमध्ये घरे घेतली आहेत, परंतु उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या प्रत्येक तासाला असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या ह्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा उशिरा कामावरून उशीर झाल्यास प्रवाशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या खिशालाही कात्री लागत आहे. कारण कामावरून येण्यास उशीर झाल्यानंतर पर्याय म्हणून बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. एक बससाठी चार-पाच बसचे प्रवासी लाईन मध्ये उभे असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिला भगिनींना गर्दीतून स्वतःच्या घरी जाण्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अथक प्रयासाने लोकल सेवा चालू झाली आहे खरी परंतु अफाट गर्दीमुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग ,महिला वर्ग आपला बहुमूल्य वेळ या लोकल प्रवासामध्ये घालवत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबालाही वेळ देण्यास त्याच्याकडे वेळ नाही. या भागातील विद्यार्थ्यांसाठी कॉलेज किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबई नवी मुंबई हा प्रवास दररोज करावा लागतो ,त्याचप्रमाणे उरण मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे .त्यात एक तासाला लोकल असल्यामुळे विद्यार्थी नोकरदार वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक एक तास स्टेशनवर दुसऱ्याला रेल्वेसेवेची वाट पहावी लागते. त्यामुळे त्यांचेशैक्षणिक नुकसान होत असल्याने कित्येक विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण मुंबईत घेणे बंद केले आहे. मुंबईमधील लोकल हि “जीवनदायिनी “समजली जाते.याउलट उरण रेल्वे सेवा ही प्रवाशांना “त्रासदायिनी” ठरत आहे.
लोकलची संख्या व वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी सर्व प्रवासी वर्गाकडून होत आहे. सकाळी ५ वाजता पहिली लोकल व रात्री साडेबारा वाजता शेवटची लोकल असल्यास सर्व सामान्य नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. उरण ते नेरूळ या विभागांमध्ये वेगवेगळ्या नोड मध्ये लोकसंख्या चार लाखांपेक्षाही जास्त असल्याने त्याचा परिणाम लोकलमध्ये अफाट गर्दी पहावयास मिळत आहे. साधारणता सर्व कार्यालयीन वेळा सर्वत्र सारख्याच असतात त्यामुळे त्या वेळेत लोकलसाठी प्रत्येक स्टेशनवर गर्दी पहावयास मिळत असते.
लोकलसेवा एक तासाच्या अंतराने असल्याने हि लोकल गेली तर लगेच दुसरी मिळेल हा पर्याय नसल्याने प्रवासी वर्गाला गर्दी तून ताटकळत प्रवास करावा लागत आहे. किंवा मग ट्रॅक्स, टु व्हिलर किंवा इतर साधनांचा वापर करून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.मग कसेतरी वेळेत पोहोचण्यासाठी जे एन पी ए ला ये जा करणाऱ्या ट्रेलरच्या मधुन ओव्हरटेक करून लवकर पोहचण्यासाठी तरुणाई जीवाची पर्वा न करता आपल्या चाकरी च्या ठिकाणी हजर होत आहे.या स्टंटबाजी प्रवासाने आजपर्यंत कितीतरी आईनी आपला पुत्र, पत्नीने आपला पती तर मुलांनी आपल्या पित्याला गमावून बसले आहेत. काही महिन्यापुर्वीच २९ वर्षाच्या एका ताईची लोकल चुकल्याने स्कुटी वर जाण्यासाठीचा तीचा निर्णय नियतीने चुकीचा ठरवला व ती आपल्या प्राणास मुकली. एक लोकल गेली तर ताबडतोब दुसरी असती तर ती ताई आज जीवंत असती.
आज या रेल्वे प्रवाशांना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. फक्त रेल्वे चालू होऊन उपयोग नाही तर या सेवेतून प्रवासी नागरिकांचे हित किती जोपासले जात आहे?लोकलसेवेमध्ये सुलभता,सुरक्षितता, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजून किती प्रवाशांचे जीव रेल्वे सेवेच्या गैरसोयी मुळे जातील ? याशिवाय नादुरुस्त लोकल उरण मार्गिकेवर उपलब्ध आहेत हे वर्षभरात दोन वेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला , लहान मुले, जेष्ठ नागरिक व असंख्य प्रवासी त्रस्त झाले होते.
सातत्याने उरण नेरूळ प्रवास करणारे हजारो गोरगरीब सर्वसामान्य प्रवासी मागणी करत आहेत की, उरण ते सीएसटी लोकल, तसेच उरण ते पनवेल लोकल ,उरण ते ठाणे लोकल करण्याची आज गरज आहे. नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उद्रेक होऊन रस्त्यावरील इतर पर्याय धोकादायक असल्यामुळे लोकल प्रवास फायदेशीर व सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्यामुळे ताबडतोब उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या मार्गावर लोकल फेऱ्या प्रत्येक पंधरा मिनिटाला करण्यात याव्यात,व असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन किंवा प्रवाशांचा उद्रेकाला सरकारला व रेल्वेला तोंड द्यावे लागेल.
५००० पेक्षा जास्त सिडको बामण डोंगरी लॉटरीतील घरांचा ताबा अनेकांना मिळाल्यामुळे तसेच उलव्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वात जास्त गर्दी बामण डोंगरी स्टेशनवर प्रवाशांची पाहायला मिळते या प्रवाशांच्या संख्येमुळे लोकल फेऱ्या जास्तीत जास्त वाढून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी अजय हेगळकर तसेच त्यांचे सहकारी नरेनजी देशमुख गव्हाणगाव, हितेश शिंगरे, स्वप्निल घाडगे ,दिनेश पवार, बाबाजी कोकाटे यांनी देखील केली आहे. त्याचप्रमाणे उरण लोकल संदर्भात वेगवेगळे मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून प्रवाशांच्या वतीने चव्हाण यांनी देखील दिलेले आहे. तरीही अजूनही रेल्वे बोर्डात जाग आलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ रामभाऊ सारीक सर यांनीही लोकल फेऱ्या एक तासाने असल्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासा संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे. आता डॉक्टर नितीन दिघे सरांनी देखील प्रवाशांच्या वतीने, या लोकलसेवेत रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकत्र करून, त्यांचे संघटन करून लोकलच्या फेऱ्या वाढण्यासाठी प्रवाशांना संघटित करून प्रवाशांच्या वतीने डॉक्टर नितीन दिघे यांनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना या विषयाची दखल घेऊन, ताबडतोब निर्णय घ्यावा असा विनंती अर्ज सर्व प्रवाशांच्या वतीने करण्यात येणार आहे.