कै. बाबूराव जोशी गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबीर उत्साहात

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातर्फे मातृभूमी परिचय शिबीर दि. २५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून काही दिवस लांब राहण्याची, स्वावलंबी जीवनाची,आपल्या समवयस्कांसोबत मिळूनमिसळून राहण्याची सवय लागावी या उद्देशाने दरवर्षी या शिबीराचे आयोजन करण्यात येते.
या शिबीरादरम्यान विविध विषयावरील मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जातात. मुलांमध्ये सामाजिक भावना वाढीस लागावी यासाठी गावभेटी आयोजित केल्या जातात. याखेरीज उपासना, सूर्यनमस्कार या नित्यनेमाच्या गोष्टींसोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, क्षेत्रभेटी यांचेही आयोजन केले जाते. आपल्या मातृभूमीचा, संस्कृतीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे व त्याविषयी आत्मीयता निर्माण करणे हा या शिबीरामागील प्रमुख हेतू आहे.

यावर्षीचे इयत्ता पाचवीचे शिबीर पावस जवळील आंबेरे या गावी ; इयत्ता सहावी व सातवीचे एकत्रित शिबीर देवरुख येथे ; तर इयत्ता आठवीचे शिबीर मालवणमधील आचरा या गावी आयोजित करण्यात आले होते. इयत्ता नववीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून गटागटाने तिन्ही शिबिरात सहभागी झाले होते.
यावेळी गुरुकुलचे सर्व शिक्षकही तिन्ही ठिकाणच्या शिबीरांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. सर्व शिबीरे गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली.





