पावसाने नुकसान झालेल्या दापोली-खेड मार्गाची १५ दिवसात पुनर्बांधणी करण्याचे ना. योगेश कदम यांचे आदेश

खेड : नुकत्याच झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या दापोली-खेड मुख्य मार्गाची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून कामाची सद्यस्थिती समजून घेतली. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत पूर्ण दुरुस्ती व पुनर्बांधणी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश ना. कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दापोली आणि खेड यांना जोडणारा हा मार्ग फक्त रस्ता नाही, तो हजारो कुटुंबांची जीवनवाहिनी आहे. नागरिकांना झालेल्या गैरसोयीची मला पूर्ण जाणीव आहे. आपण तातडीने आणि नियोजनबद्ध काम पूर्ण करून नागरिकांना स्थायिक, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता देणार आहोत.
ना. योगेश कदम, गृहराज्यमंत्री महाराष्ट्र.
महायुती सरकार नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देते. आपत्ती असो वा अडचण सरकार नागरिकांच्या पाठीशी नेहमी ठाम उभे आहे, असेही ना. कदम यांनी या रस्त्याची पाहणी केली त्यावेळी सांगितले.