गणेशोत्सवासाठी कोकणात गतवर्षीपेक्षा अधिक गाड्या सोडाव्यात

- माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे मागणी
- रेल्वे मंत्र्यांनी खासदार नारायण राणेंना केले आश्वस्त
रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आगामी गणेश चतुर्थी साठी गतवर्षीपेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी गतवर्षीपेक्षा जास्त गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबतचे पत्र खा. नारायण राणे यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले होते तसेच त्यांची दिल्ली येथे भेट घेऊन कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न प्रत्यक्षात मांडला. गणेशोत्सवाचे कोकणवासीयांसाठी मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक, विशेषतः मुंबई आणि पुणे येथून, आपल्या मूळ गावी उत्सवासाठी प्रवास करतात. या काळात प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते आणि रेल्वे आरक्षण मिळवणे कठीण होते.
गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने गणेशोत्सवासाठी 342 विशेष गाड्या चालवून चांगला प्रतिसाद दिला होता. यावर्षी भाविकांचा प्रवास अनुभव आणखी सुधारण्यासाठी खासदार राणे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

त्यामध्ये, मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवावी. प्रवाशांना प्रवासाची योजना आगाऊ करता यावी आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता यावी यासाठी या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करणे सुनिश्चित करावे. प्रवाशांना सामावून घेण्यासाठी, विशेषतः स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये, सध्याच्या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची शक्यता तपासावी. कोकण प्रदेशातील व्यापक ठिकाणांना कव्हर करण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग वाढवण्याचा विचार करावा, जेणेकरून भाविकांना अधिक सोयीस्कर पोहोच मिळेल. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा पुरवल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि गणेशोत्सव सुरळीत साजरा होण्यास मदत होईल असे नमूद केले होते.
या बैठकीदरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कोणताही त्रास होणार नाही याची याची ग्वाही दिली. तसेच, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनाला दिले.
या निर्णयामुळे गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे.
खा. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संगमेश्वर रोड स्टेशनवर गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी पत्राद्वारे केली होती.
या संदर्भात आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 10 जुलै 2025 रोजी रेल्वे बोर्डाला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, 19577/19578 जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि 20910/20909 पोरबंदर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेसचा संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबा कार्यान्वित करणे शक्य आहे. सध्या संगमेश्वर रोड स्टेशनवर 12 गाड्या थांबतात, ज्यात 10 दैनिक एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. वित्तीय वर्ष 2024-25 मधील आकडेवारीनुसार, संगमेश्वर रोड स्टेशनवरील तिकिट विक्री आणि उत्पन्न समाधानकारक आहे, ज्यामुळे येथे अतिरिक्त थांबा देणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आहे,असे म्हटले आहे.