जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई दि १२ : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात् आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मंत्री राणे म्हणाले की, रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा पुरविण्यात याव्यात. यासाठी आवश्यक जागा निश्चित करावी. तसेच, राष्ट्रीय जलमार्ग ५३ अंतर्गत डोंबिवली येथे जेट्टीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे. सागरी महामर्गालगत असलेल्या व्यावसायामार्फत मिळणारा महसूल पर्यटकांची सुरक्षा, जलपर्यटन, जेट्टी देखभाल दुरूस्तीसाठी प्राधान्याने खर्च करावा, जेट्टी संदर्भात धोरण आखण्यात यावे अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
रत्नागिरी येथील साखरीनाटे मत्स्यबंदाराचा विकास करणे, रायगड येथील दिघी या जुन्या जेट्टीची लांबी व रूंदी वाढवून तेथे लिंकस्पॅन व पांटून बसविणे, वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी पाईल जेट्टीचे बांधकाम करणे व तत्सम सुविधा निर्माण करणे, काशिद येथे रो रो सेवेकरीता तरंगती जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करणे, देवबाग येथील कर्ली नदीच्या तटाचे संरक्षण करणे संदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीत विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी चे अध्यक्ष उमेश वाघ तसेच भारतीय नौसेना च प्रतिनिधी उपस्थित होते.