पाऊस आला तरी गटाराचे काम अर्धवट ; आरवलीत सर्व्हिस रोडचे काम सुरु

आरवली : अख्खा उन्हाळा गेला पण, जाग नाही आली.. आता पावसाळा सुरू झाला. महामार्गाच्या सर्व्हिस रोडला ठेवलेल्या गटाराचे काम अर्धवट असताना येथील बाजारपेठेतील सर्विस रोडचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील बाजारपेठेत उड्डाण पुलाखाली दोन बाजूला सोडण्यात आलेल्या सर्विस रोड पैकी चिपळूण- रत्नागिरी दिशेच्या सर्विस रोडचे तसेच त्याच्या बाजूने काढण्यात आलेल्या गटारचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे. मात्र रत्नागिरी चिपळूण दिशेने सोडण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचे काम पाऊस सुरू झाला तरी पूर्ण झालेले नाही. या सर्व्हिस रोडलगतचे गटाराचे काम अजून अपूर्णच आहे.

उड्डाणपुलाखाली पावसामुळे प्रचंड चिखल झाल्यामुळे ठेकेदाराने तात्पुरती खडी टाकल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आता पाऊस कमी झाल्यामुळे दुसऱ्या लेनवरील काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. जोरदार पाऊस सुरू व्हायच्या आधी बाजारपेठेतील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले गेले नाही तर चिखलाचा सामना व वाहधारक तसेच नागरिकांना देखील करावा लागणार आहे.