महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

दापोलीतील पूरग्रस्त कोळंबे कुटुंबियांना शासनाकडून ४ लाखांच्या मदतीचा धनादेश

  • महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कोळंबे कुटुंबियांचे सांत्वन

रत्नागिरी, दि. २९ : दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीत पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने राजेंद्र सोनू कोळंबे यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेची तातडीने दखल घेत महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या निवासस्थानी आज भेट देवून, कुटुंबियांचे सांत्वन केले. शासनाच्यावतीने चार लाखाच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला.
कोळंबे यांची कन्या प्रज्ञा हिला बारावीत ८३ टक्के गुण मिळाले आहेत. तिला तसेच दहावीत असणाऱ्या भावाच्या पुढील शिक्षणासाठी ‘कोणती मदत लागली तर मला सांगा मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात राज्यमंत्री श्री कदम यांनी कोळंबे कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी तहसीलदार अर्चना बोंबे, किशोर देसाई, उन्मेष राजे,भगवान घाडगे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर कालेकर, जि. प. माजी सदस्य चारुता कामतेकर, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायत सदस्य निलेश कांगणे, माजी उपसरपंच किशोर काटकर,माजी नगरसेवक सचिन जाधव, मोहन शिगवण, सुनील गुरव आदी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणीही नवीन पुलासाठी तातडीने मंजुरी देऊन, त्याची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला श्री कदम यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या छोट्या पुलामुळे दरवर्षी येणारे पाणी व त्यामुळे होणारा खोळंबा व दुर्घटना घडण्याची भीती या सगळ्याची तातडीने दखल घेतली आहे. त्यामुळे वणंद ग्रामस्थांची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button