मुसळधार पावसामुळे दापोलीत एकजण वाहून गेला ; शोध सुरुच

दापोली : गेल्या काही दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दापोली तालुक्यात एकजण वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. तालुक्यातील वणंद गावातील कांगणेवाडी येथे राहणारे राजेंद्र उर्फ राजू कोळंबे (४५) हे तेथील नदीला आलेल्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना सोमवार दि. २६ रोजी सकाळी घडली आहे.
दि. २६ रोजी दापोलीत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे कोंडी नदी पुलावरून पुराचे पाणी जात होते. कोळंबे हे कांगणेवाडीतून या पुलावरून गुजरवाडीतून रोज दापोलीत कामाला ये-जा करत होते तर दि २६ रोजी दापोली शहरात रात्रपाळी करून सकाळी ते घरी परतत असताना ते पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याने बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच दापोली महसूल, दापोली पोलीस प्रशासन, गावकरी त्यांचा शोध घेत होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या कोळंबे यांचा शोध सुरूच होता.