रत्नागिरीत कोकण विभागस्तरीय दोन दिवसीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

- कोकण कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहॆ. कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करु. जेणेकरुन कोकण पहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दि. 31 मे व १ जून 2025 या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे.
आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. माझ्या ३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम हे पत्रकारांनी केले आहे. हे माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मियता आहे.
कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पहावा, त्याची प्रसिध्दी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत पुढे म्हणाले, समाज माध्यमांमूळे मोठमोठया घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करुन घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते. कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे. हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर हे देखील कोकणातलेच. मी स्वत:ला सुदैवी मानतो कारण माझा जन्म या भूमीत झाला आहे आणि मी सध्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पत्रकारितेचे जन्मस्थान असलेले कोकण आम्ही कसे विकसीत केले, कसे जपून ठेवले आहे, हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकरांनी पहावे यासाठी पुढील कार्यशाळा ही संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार काम करतात. अशा पत्रकारांच्या मागे राज्यकर्त्यांचा राजाश्रय शंभर टक्के उभा करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज ज्या प्रमाणे ही कार्यशाळा घेतली आहे. त्याप्रमाणे पत्रकारांसाठी आवश्यक सेवा सुविधांची निर्मिती करण्यात येईल महाराष्ट्रात पत्रकारांचा फक्त सन्मान नाही, तर पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची निर्मितीही केली जाते. हे चित्र देशात निर्माण झाले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डाॕ सामंत यांनी केले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल, कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, दै. महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, वरिष्ठ पत्रकार अरविंद (अण्णा) कोकजे, राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्य श्रीमती जान्हवी पाटील, कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रणव पोळेकर, मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हा अध्यक्ष अनंत ताफेकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मेहरुन नाकाडे, सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव, अलिबाग प्रेस क्लब असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव निलेश पानमंद, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहार संघाचे कोषाध्यक्ष विनोद यादव, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन (महाराष्ट्र) चे अध्यक्ष उदय जाधव, रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे, दीपक दळवी, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक खान यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.