रत्नागिरीत ग्रामीण प्रतिभेला टेक्नॉलॉजीची जोड देणारे ॲनिमेशनचे दालन खुले

रत्नागिरी : रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जोड देणाऱ्या ॲनिमेशनच्या अत्याधुनिक दालनाला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली.
आज ब्रॉड पीक एनिमेशन स्टुडिओला दिलेली भेट ही एक अद्वितीय अनुभव होता. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात अशा प्रगत स्टुडिओची उभारणी ही एक मोठी प्रेरणा आहे. क्रिएटिव्ह कल्पनांचा, मेहनतीचा आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळाला. स्टुडिओतील कलाकार आणि तज्ज्ञ टीम ज्या प्रकारे आपल्या कल्पनांना सजीव रूप देतात, ते खरंच प्रेरणादायी आहे. ऍनिमेशन, ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि स्टोरीटेलिंग या सगळ्याच क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या आधुनिक स्टुडिओमध्ये केवळ ऍनिमेशन आणि व्हिज्युअल कंटेंट निर्मितीच होत नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही ही एक सशक्त दिशा ठरते आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

या स्टुडिओच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व करिअरच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करता येते, हे ब्रॉड पीकच्या कार्यातून सिद्ध होत आहे. निसर्गरम्य कोकणात, खासकरून रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात असा अत्याधुनिक आणि सृजनशील ऍनिमेशन स्टुडिओ उभा राहत आहे, हे एक अभिमानास्पद बाब आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून रत्नागिरी आणि परिसरातील प्रतिभावान, पण संधीपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने नव्या उंचीवर नेण्याचे काम सुरू आहे.
रत्नागिरीतील ब्रॉड पीक एनिमेशन स्टुडिओ म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नव्या संधींचं द्वार आहे.
– ना. उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी.
या स्टुडिओमध्ये केवळ व्यावसायिक प्रकल्पांवर काम होत नाही, तर येथील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकण्याची, घडण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक तरुणांना Animation, VFX, 3D Designing, Storyboarding अशा आधुनिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण, उद्योगाशी संलग्न प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी, कोकणातील विद्यार्थ्यांनाही मुंबई, पुणे किंवा इतर महानगरांमध्ये न जाता जागतिक दर्जाचे काम करण्याची संधी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि इंटर्नशिपच्या संधी असे अनेक फायदे होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.