Konkan Railway | ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे कोकण रेल्वे साडेतीन तास विस्कळीत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी येथे ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्यांचा खोळंबा झाला. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही मंगला एक्सप्रेस रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली येथे आली असता गाडीचा पॅन्टोग्राफ रेल्वे गाड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेमध्ये अडकून ती तुटल्यामुळे ओव्हरहेड वायर मध्ये बिघड निर्माण झाला. यामुळे त्रिवेंद्रम ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस सह 11 गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर साडेतीन तास खोळंबा झालेली रेल्वे वाहतूक सुरू झाली.