मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे आठ दिवसात हलवा अन्यथा कारवाई

मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर बंदरातील ल ३१९ बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीसा
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिकच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे साहेब यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. त्यानुसार १६ जानेवारी२०२५ रोजीच्या नोटीसांव्दारे पुढील ७ दिवसात येथील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ३१९ धारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय विभागकडून देण्यात आली आहे. १३ जानेवारीरोजी मा. मत्स्य व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य विभागाची बैठक रत्नागिरीत झाली होती. त्यावेळी मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असलेल्या धारकांवर पोलीस विभागाचे संरक्षण घेऊन प्रशासनामार्फत सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत ना. राणे यांनी निर्देश दिले होते.
मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून भूमापन क्र. ७३/०२ मध्ये १०.८४ हे. आर एवढे क्षेत्र आहे. सदरच्या शासकीय जागेत कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरी सुद्धा या जागेमध्ये सुमारे ३१९ अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा यांचे मार्फत बहुतांश वेळा नोटीस देण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे दि. १६/०१/२०२५ रोजीच्या नोटीसांव्दारे पुढील ७ दिवसात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ३१९ धारकांना कायदेशीर नोटीस बजावणी करण्यात आली आहे.
तरी मिरकरवाडा बंदरात प्राधिकरणाच्या कक्षेतील अनधिकृत बांधकाम धारकांनी विहित मुदतीच्या आत आपले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे अन्यथा सदरचे बांधकाम प्रशासनाकडून हटविण्यात येऊन यासाठीचा खर्च संबंधिततांकडून वसूल करण्यात येईल, असेही मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.