रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठी विश्रामगृह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या “नातेवाईकांसाठी विश्रामगृह” या सुविधेचे लोकार्पण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता लक्षात घेऊन ही सुविधा पुरवण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची काळजी घेताना नातेवाईक अनेक अडचणींना सामोरे जातात. यात राहण्याची गैरसोय ही सर्वात महत्त्वाची. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठची विश्रामगृह रत्नागिरी येथे उभारण्यात आले, ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, असे पालकमंत्री उदय सामंत उद्घाटन प्रसंगी म्हणाले.
हे विश्रामगृह केवळ निवासासाठी नाही, तर नातेवाईकांना मानसिक आधार देणारे, एक धीर देणारे ठिकाण ठरेल. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला “आपुलकीचा आणि सुरक्षित आधार” मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे आहे.
महिलांसाठी स्वतंत्र कक्ष
विश्रामगृहात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन, बसण्याच्या व झोपण्याच्या सोयी – सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नातेवाईकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरात परगावाहून आले असताना मोठा दिलासा मिळेल.
या कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी, वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभागप्रमुख सचिन सावंत यांसह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.