महाराष्ट्रराजकीय

काँग्रेस तगडे आणि अभ्यासू उमेदवार देणार  : महेंद्रशेठ घरत

  • शेलघर येथे आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी  

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : महापालिका आणि नगरपालिकांत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तगडे आणि अभ्यासू उमेदवार कॉंग्रेस पक्ष उभे करेल. या निवडणुकांत तरुणांना संधी दिली जाईल. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जातील. शक्य असेल तिथे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वबळावर उमेदवार उभे केले जातील. त्यामुळे निश्चितच रायगडमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल. कार्यकर्त्यांनी सकारात्मक विचार करावा, असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. शेलघर येथे शनिवारी (ता. १७) आढावा बैठक झाली. त्यात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. 

यावेळी राणीताई अग्रवाल म्हणाल्या, “कॉंग्रेस फक्त पक्ष नाही तर विचारधारा आहे. ती संपणार नाही. कार्यकर्त्यांत उत्साह आहे. महेंद्रशेठ घरत हे जिंदादिल आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच निवडणुकीसाठी विचार व्हावा, बाहेरून ऐनवेळी कॉंग्रेसमध्ये आलेल्यांना तिकीट मिळणार नाही.”

यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रायगडच्या प्रभारी राणीताई अग्रवाल, निरीक्षक मनीष गणोरे, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, नंदराज मुंगाजी, मनीष पाटील, वसंत काठावले,  हेमराज म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, अलिबाग येथे कॉंग्रेसची शुक्रवारी (ता. १६) आढावा बैठक झाली. महेंद्रशेठ घरत हे अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, “जे कॉंग्रेसमध्ये आहेत त्या सर्वांचे अभिनंदन! आपण जिंकू शकतो, अशक्य काहीच नाही, अंतुले साहेबांचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा निश्चितच आदर केला जाईल. त्यांना विश्वासात घेऊनच आपण निवडणुका लढवू. जर एखाद्या तालुक्यात स्वबळावर लढण्याची परिस्थिती असेल तर त्या पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिले जाईल. त्यामुळे मनात आणले तर आपण निश्चितच चांगल्या जागा जिंकू शकतो.” 

यावेळी राजाभाऊ ठाकूर म्हणाले, “जनादेश आहे त्यांना एबी फार्म द्या, हा जिल्हा काँग्रेसचा आहे. महेंद्रशेठ घरत पॉवरबाज आहेत, ते काहीही करू शकतात. ज्या जागा लढवू त्या जिंकणारच.”

सोशल मीडियाचा वापर आवश्यक आहे. साम, दाम, दंड वापरून ते जिंकतात, आपली विचारधारा लोकशाही मार्गाने जाणारी आहे. काळ खूप कठीण आहे, पण खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. 

यावेळी कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष, कार्यकर्ते, अलिबाग जिल्हा निरीक्षक शाह आलम, प्रदीप रावत, इस्माईल घोले आदी उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button