महाराष्ट्र

भौतिक गरजा भागवणारी पंचतत्वे जपा : जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज

गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाची सांगता

गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाची सांगता

नाणीज : भगवंतांनी सजीवांच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी पाणी, वायू , अग्नी, पृथ्वी व आकाश या पंचतत्वाची निर्मिती केली .तो ती जीवसृष्टीला विनामूल्य व अविरतपणे देत आहे. त्यातील मानवाचा हस्तक्षेप थांबवून या पंचतत्वाची जपणूक झाली पाहिजे व हे समजून सांगण्यासाठी सद्गुरूंची गरज असते, असा उपदेश जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केला.


नाणीज क्षेत्री दोन दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा समारोप जगद्गुरू स्वामीजींच्या प्रवचनाने झाला. त्यात त्यांनी हे विचार मांडले.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना मार्गदर्शन करताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले,” आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी ही भौतिक तत्वे ईश्वर सजीव सृष्टीला विनामूल्य व अविरत देत आहे. त्यापैकी ज्या ज्या तत्वात माणसाने हस्तक्षेप केला, ते सर्व महाग झाले आहे. पाणी, ऑक्सिजन, वीज, जमिनी, राहती घरे या गोष्टी माणसांमुळे महाग झाल्या आहेत. भगवंत फुकट देतात पण त्याची कोणाला किंमत नाही. या पंचतत्वात माणूस अविचाराने हस्तक्षेप करून पर्यावरण प्रदूषित करीत आहे. काही शहरांत श्वास घेणेही अवघड झाले आहे. म्हणून पंचतत्वाची जपणूक करायला हवी. हे सांगण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे.”


ते पुढे म्हणाले,”पाणी हे जीवन आहे. ते जपून वापरले पाहिजे. कारण जलसाठे संपत चालले आहेत. त्यासाठी पाणी जपून वापरले पाहिजे. पावसाचे पाणी जमिनीत जीरवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आपल्याला अन्न मिळते. वायूचे महत्व आपल्याला कोरोना काळात कळाले. संत तुकाराम यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हटले आहे. त्याच झाडांची माणूस कत्तल करतोय. हे सारे जपले पाहिजे. सद्गुरू हे ज्ञान देतात. सन्मार्ग दाखवतात. अलभ्य असा मानव देह पूर्वपुण्याईने लाभला आहे. तो देवाच्या व मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करा” असे ते म्हणाले.
रात्री या प्रवचनानंतर देवाला साकडे घालून या वारी उत्सवाची सांगता झाली. भाविकांचा विराट जनसागर श्रद्धेने सुंदरगडावरून पायउतार झाला.

नाणीज क्षेत्री सुंदरगडावर सोमवारी रात्री उशिरा प्रवचन करताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. समोर भाविक.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button