महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी श्रुती शाम म्हात्रे

- पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्यात श्रुती म्हात्रे यांची महत्वाची भूमिका
उरण (विठ्ठल ममताबादे ) : काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सर्व कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पक्ष श्रेष्टीनी श्रुती म्हात्रे यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले आहे.
काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या व वयक्तिक स्वार्थ न बघता समाजहीत, पक्ष हित डोळ्यासमोर ठेऊन नेहमी कार्यरत असणाऱ्या व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक संप आंदोलन, मोर्चा बैठका मध्ये नेहमी सहभागी होणाऱ्या व अन्याया विरोधात नेहमी आवाज उठविणाऱ्या, गोर गरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रुती म्हात्रे यांची निवड काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी झाल्याने काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण असून काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. श्रुती म्हात्रे यांचे सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक गणेश पाटील यांची नवनिर्वाचित कार्यकारी समिती सदस्य तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी. भाई घरत यांच्या समवेत श्रुती शाम म्हात्रे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी श्रुती शाम म्हात्रे यांची निवड केल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सह प्रभारी बी .एम .संदीप , व्यंकटेशजी , म.प्र.काँ. क. ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना भेटून श्रुती म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
या बाबतीत श्रुती म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आत्ताच जाहीर झालेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ची नवीन कार्यकारणी जाहीर झाली. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी माझी निवड केली आणि अनेकांचे मेसेज आले.खरंतर पक्षाचं काम करत असताना आपण जिल्ह्यात काम करतो किंवा महाराष्ट्रात काम करतो यापेक्षा आपण पक्षाचे काम करतो याचा अभिमान नेहमीच होत असतो. माझ्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत पक्षाने न मागितलेली जबाबदारी अचानकपणे दिली याबद्दल काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करते.