मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वे गाड्या १० फेब्रुवारीपासून धावणार!
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या ८ ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या दि. १० फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांसाठी आहे. मध्यम वर्गीयांना न्याय देणारा, हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ठेवून मांडलेला आहे.
रेल्वेला वर्ष 2014 पासून भरीव आर्थिक तरतूद केली जाते. महाराष्ट्राला 16 हजार कोटी रूपये मागील अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यातून राज्यातील रेल्वे प्रकल्पाची बरीच प्रलंबित कामे झालेली आहेत. भारतात येत्या काळात एकूण 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील सध्या 8 वंदे भारत रेल्वेगाड्या राज्यात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची, माहिती श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले. या वंदे भारत रेल्वेगाड्या सोलापूर ते मुंबई पहिली आणि दुसरी मुंबई ते शिर्डी अशा असणार आहेत.