महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प : ना. नितेश राणे

- लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.
मुंबई : राज्यातील महायुती सरकारने सोमवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 4300 कोटीचा बांबू लागवड प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातील 5818 गावांमध्ये 427 कोटी रुपये किमतीची एक लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत.
याचबरोबर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे आणि त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण राज्य सरकार आखत आहे.
शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात याचा 50 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून येत्या दोन वर्षात यासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील आरोग्य, पर्यटन त्याचबरोबर पायाभूत सुविधा , मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, गडकिल्ल्यांचे संवर्धन, त्याचप्रमाणे औद्योगिक विकास यासाठी देखील महायुती सरकारने अंदाजपत्रकात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्राला सर्व समावेशक विकास पथावर नेण्याचे कार्य या अर्थसंकल्पात आहे त्यामुळे मी या अर्थसंकल्पाचे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून स्वागत करतो, असेही ना. नितेश राणे यांनी सांगितले.