महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५००० जादा बसेस धावणार!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना, मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणरायाचे आगमन होणार असून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान या जादा गाड्या धावतील.
गणपतीसाठी एसटीची खास सोय
- ५००० जादा बसेस: यंदा एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता कोकणातील चाकरमान्यांसाठी तब्बल ५००० जादा बसेस उपलब्ध करून देत आहे. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.
- आरक्षण सुविधा: या बसेससाठी आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर, बसस्थानकांवर किंवा MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.
- गट आरक्षण २२ जुलैपासून: व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होणार आहे.
- महिला व ज्येष्ठांना सवलत: अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.
- प्रस्थान ठिकाणे: २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सुटणार आहेत.
उत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज:
आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी ५२०० जादा बसेस सोडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, आता गणपती उत्सवासाठीही एसटीने कंबर कसली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती सहा. जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिली. - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने केलेली ही सोय नक्कीच दिलासा देणारी आहे. त्यामुळे आता प्रवास अधिक सुकर होणार असून, बाप्पाच्या भेटीची ओढ अधिकच वाढणार आहे. आपल्या प्रवासाचे नियोजन आत्ताच करा!