रत्नागिरी अपडेट्स

शरद दादा बोरकर यांचे कार्य अविरत सुरू राहावे : डॉ. कांबळे 

खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे जाणकार ह. भ. प. शरद दादा बोरकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह अनेक क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे कार्य केले आहे. या कार्याचा वसा आणि वारसा ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांनी अविरतपणे सुरू ठेवावा, अशी अपेक्षा डॉ. अनिल कुमार कांबळे यांनी व्यक्त केली.

ते  प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शरद दादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

यावेळी गेली अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या भिकाजी गणपत तथा नानासाहेब विचारे यांना ह. भ. प. शरद दादा बोरकर जीवनगौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानने घेतलेल्या  विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात अविरतपणे  कार्य करत असलेल्या लोकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 

डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, “आपण सर्वांनीच शरद दादा बोरकर यांनी चालविलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.” या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सागरी पोलीस ठाणे जयगडचे जयदीप कळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  ते म्हणाले,”समाजामध्ये कार्य करत असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्या क्षेत्राला न्याय देऊन त्या – त्या संबंधित क्षेत्रामध्ये सर्वांनीच अतुलनीय कार्य केल्यास समाजाकडून आपला नक्कीच गौरव होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

श्री राजन बोडेकर  यांनी  ह. भ. प. शरद दादा बोरकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला

जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्तात्रय कदम यांनी दादा बोरकरांच्या कार्यामधील वेगळेपण आणि त्यांच्यातील महत्त्वाचे गुण सांगितले. तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर यांनी भविष्यात कवी केशवसुत स्मारक नेहमीच या प्रतिष्ठानच्या सोबत असेल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद दादा बोरकर यांच्या कार्याबद्दल माहिती प्रतिष्ठानचे अरुण मोर्ये यांनी दिली.  प्रास्ताविक प्रतिष्ठानचे निखिल बोरकर यांनी  केले. ते म्हणाले, “भविष्यातही  शिक्षण, आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रमांची राबविण्याची आमची इच्छा असून सर्वानी सहकार्य करावे.”

यावेळी पुरस्कार विजेत्या पुरस्कारार्थीनीही आपले मनोगत व्यक्त करत दादांच्याप्रति संवेदना जपत प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे, नारायण बोरकर, अशोकराव विचारे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत गुरव,शेखर भडसावळे, बावीस खेडी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रजत पवार, वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधाकर शिर्के, नांदीवडे सरपंच आर्या गडदे, चाफेरी सरपंच अंजली कांबळे, मुख्याध्यापक जयवंत देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार विजेते, स्पर्धा विजेते व मोठ्या प्रमाणात शरद दादा बोरकर यांच्या प्रति आदर असणारे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर बोरकर, सुदेश महाकाळ, निखिल बोरकर, निनाद चव्हाण, संदेश महाकाळ, सुयोग बोरकर, अरुण मोर्ये, विश्वनाथ शिर्के, प्रणय बोरकर, भालचंद्र कोकरे आणि माधव अंकलगे यांनी विशेष प्रयत्न केले. तर संपूर्ण कार्यक्रमासाठी वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

ह. भ. प. शरद बोरकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यां मान्यवरांचा सन्मान सन्मान करण्यात आला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button