मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली बाजारपेठेतील सर्व्हिस रोड अपूर्ण; प्रवाशांची गैरसोय

- एसटी बसेस थांबू लागल्या उड्डाण पूलावरच!
रत्नागिरी: मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे (NH 66 ) काम वेगाने सुरू असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील अरवली बाजारपेठेतील दुसऱ्या बाजूचा सर्विस रोड (Service Road) अजूनही अपूर्णच आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी हे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


काय आहे नेमकी समस्या?
- अपूर्ण सर्विस रोड: आरवली बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) रत्नागिरी-चिपळूण बाजूचा सर्विस रोड अर्धवट सोडला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी प्रवाशांची गैरसोय वाढत आहे.
- उड्डाणपुलावरून प्रवास: एका बाजूची वाहने उड्डाणपुलावरून जात असल्यामुळे, प्रवाशांना थांब्यावर उतरता येत नाही. त्यांना बाजारपेठेत जाण्यासाठी बऱ्याच लांब अंतरावर असलेल्या उड्डाणपूल संपल्यानंतरच्या तात्पुरत्या थांब्यावर उतरावे लागते.
- सामानासह पायपीट: प्रवाशांना आपले सामान घेऊन तात्पुरत्या थांब्यापासून बाजारपेठेपर्यंत पायपीट करावी लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.
स्थानिक रहिवाशांची मागणी
अपूर्ण राहिलेले हे काम तातडीने पूर्ण करून रत्नागिरी-चिपळूण बाजूचा सर्विस रोड वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी जोर धरत आहे. याविषयी अनेक वेळा प्रशासनाला कळवूनही काहीच उपाययोजना झाल्या नाहीत, असे स्थानिक नागरिक सांगतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.