उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच विविध सवलती मिळणार : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा शुक्रवारी (दि. २३) करंजा येथे जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी मच्छिमार बांधवांसोबत संवाद साधला. शेतकर्‍यांना ज्या ज्या सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सर्वच्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. या अनुषंगाने शंभर टक्के पूर्तता होण्यासाठी मी व माझे खाते प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते करंजा येथील सभेत बोलत होते.


मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा शुक्रवारी (दि. २३) करंजा येथे जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

या समारंभाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते रवी भोईर, कौशिक शाह, तालुकाध्यक्ष धनेश गावंड, शहराध्यक्ष प्रसाद भोईर, गव्हाण-वडघर अध्यक्ष रूपेश धुमाळ, कर्नाळा अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, युवा मोर्चा शहराध्यक्ष निलेश पाटील, जितेंद्र घरत, महेश कडू, गोपीशेठ म्हात्रे, शशी पाटील, मुकुंद गावंड, राजेश नाखवा, हितेश शाह, मनोहर साहातिया, राजू ठाकूर, मनन पटेल, संगीता पाटील, शमिता ठाकूर, सुगंधा कोळी, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, निशा म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शासनाचे अधिकारी, कोळी समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसात मस्यव्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सर्व सवलती आता मच्छिमारांनाही मिळणार असून यामुळे त्यांच्या आयुष्यात बदल घडणार आहे. वीज दरात सवलत, किसान क्रेडिट कार्डचा लाभ, मासेमारी साहित्य सवलतीच्या दरात मिळेल तसेच वादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत मिळणार आहे.करंजा हे देशातील एक नंबरचे बंदर ठरेल व महाराष्ट्राच्या विकासात भर टाकेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी हे समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी झटत असतात, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आज अनेक महत्त्वाचे प्रकल्प पनवेल आणि उरण तालुक्याच्या अवतीभोवती आले आहेत. पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन ते तीन महिन्यांत सुरू होणार आहे. अटल सेतू हा महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटावा असा प्रकल्प उरण तालुक्यात आला. त्यामुळे रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. या माध्यमातून येथील विकासाला चालना मिळाली आहे.
आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात मच्छीमार बांधवांच्या समस्या अधोरेखित केल्या. करंजा बंदराचे उर्वरित काम पूर्ण होणे बाकी आहे. ते मार्गी लागावे. मोरा, नवापाडा येथील मच्छीमारांना मोबदला मिळावा. रेवस-करंजा ब्रिजमध्ये बाधित होणार्‍यांना नुकसानभरपाई द्यावी. सर्व मच्छीमारांना डिझेल परतावा मिळावा तसेच छोटी बंदरे, पकटी निर्माण कराव्यात याकडे त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. केंद्र व राज्य सरकार जनतेच्या हितासाठी कार्यरत आहेत. सरकारच्या माध्यमातून मच्छीमारांचे कल्याण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रम प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व इतर मान्यवरांनीही विचार मांडले. करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले.उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटना तर्फे उरण मधील विविध समस्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांना निवेदन देण्यात आले.समस्या सोडविण्याचे नितेश राणे यांनी आश्वासन दिले.एकंदरीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button