ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230610-WA0019-780x470.jpg)
भाट्ये येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन
रत्नागिरी दि 10 : राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा यासाठी आपण सतत प्रयत्नशिल आहोत . जिल्ह्यातील विविध गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
भाट्ये येथील बहुउद्देशिय सभागृहाचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी बांधकाम सभापती बाबू म्हाप, सरपंच प्रिती भाटकर, सुरेंद्र भाटकर,दिलीप भाटकर,विवेक सुर्वे,नंदा मुरकर,तुषार साळवी, ,पराग भाटकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या बहुउद्देशीय सभागृहाचा फायदा गावातील बचत गट तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल. गावातील बचत गट जी उत्पादने तयार करतील त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपली आहे.भाटये गावाच्या विकासासाठी सुमारे 4 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भाट्ये नंतर त्यांनी फणसोप येथेही विविध विकास कामांचे भुमिपुजन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, गावामध्ये विकास कामे करताना राजकीय मतभेद दूर ठेवावेत . या गावासाठी नळ पाणी योजना, रस्ते, स्मशानभूमी, साकव आदी कामांसाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर केल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले .
पालकमंत्री उदय सामंत यांनी भाटये, फणसोप, कोळंबे आदी ठिकाणच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन व उद्घाटन केले. याप्रसंगी तेथील स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.