पालगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

- गतिमान, लोकोपयोगी काम आणि नागरिकांचे समाधान हे शासनाचे धोरण : महसूल राज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी : प्रत्येक नागरिकाच्या समाधानासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, गतिमान आणि लोकोपयोगी कामांवर भर देत आहे. हे शासन जनतेच्या हिताचे असून, त्यांना अपेक्षित सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
दापोली तालुक्यातील पालगड येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसिलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
महसूल राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, महाराष्ट्र शासन जनतेच्या समस्या सोडवून त्यांना समाधान देण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांना अडचणीशिवाय सेवा पुरवण्याचा सरकारचा मानस आहे. असे सांगून, यापुढेही अशी शिबिरे राज्यभर आयोजित करून, जनतेला लाभ पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी दापोली तालुक्यातील कॅम्प दापोली, दाभोळ, हर्णे, आंजर्ले, बुरोंडी, आगरवायंगणी, देगाव, वेळवी, वाकवली आणि पालगड येथे ही शिबिरे घेण्यात आली. ९ जूनपासून आज अखेर ही शिबीरे आयोजित करण्यात आली. गावागावातील जनतेस दैनंदिन कामकाजासाठी लागणारे विविध दाखले, महसूल विषयक सेवा या शिबिरातून देण्यात आल्या.
शिबिरांमध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिनल दाखले, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी कागदपत्रे, शिधापत्रिका वाटप, जिवंत सातबारा, अग्रीस्टॅक नोंदणी, एकुप नोंदी/वारस नोंदी, निसप्र विषयक नोंदणी (वर्ग 2 च्या नोंदी वर्ग 1 करणे) अतिक्रमित बंद रस्ते सुरु करणे, अनुक्रमांक देणे व सातबारावर नोंदणी करणे अशा विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांना त्यांच्या गरजांच्या प्रमाणपत्रांसाठी त्वरित सेवा मिळाली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.