चिपळूण : येत्या १५ दिवसामध्ये चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पुलांच्या ठिकाणी विसर्जन घाट बांधण्यास सुरुवात झाली नाही तर सर्वपक्षीय आंदोलन करु, असा इशारा चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी प्रशासनाला दिला आहे
काविळतळी, ओझरवाडी, मतेवाडी, माळेवाडी, गांधीनगर, कळंबस्ते, येथील आजुबाजजूच्या परिसरातील हजारो गणपती विसर्जन केले जातात. पूल तोडल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम व विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आम्ही विसर्जनच्या ठिकाणी पाहणी करुन विसर्जन घाट बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती.
दीड महिन्यांवर गणपती सण आला तरी वरील ठिकाणी गणपती विसर्जनची सबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची आजतगायत नियोजन अथवा उपाययोजना केलेली नाही.
येत्या १५ दिवसामध्ये विसर्जनच्या ठिकाणी विसर्जन घाट बांधण्यास सुरुवात झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असे शौकतभाई मुकादम यांनी म्हटले आहे. तसे लेखी पत्र मुंबई-गोवा हायवेचे विभागाचे उपअभियंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहे.
