रत्नागिरी : कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर (Aare Ware Beach) पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. सावर्डे, करवीर) असे मृत पावलेल्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्या एका मित्राला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.
४० विद्यार्थ्यांची सहल; पण आनंद ठरला शेवटचा
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सावर्डे येथील एका खासगी शिकवणी वर्गातील (Private Tuition Classes) ४१ विद्यार्थ्यांचा समूह शिक्षकांसह कोकण पर्यटनासाठी आला होता. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शन घेतल्यानंतर हा सर्व ग्रुप दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला.
समुद्राचा मोह आवरता न आल्याने विद्यार्थी पाण्यात सुरक्षित ठिकाणी आंघोळ करत होते. यादरम्यान अतुल सुतार हा पोहत समुद्राच्या आतल्या बाजूला गेला. त्याला परत बोलावण्यासाठी त्याचा मित्र मयूर विष्णू खाडे (वय १६) हा देखील त्याच्या मागे गेला. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि जोरदार करंटचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले आणि गटांगळ्या खाऊ लागले.
पोलीस आणि झीप लाईन कर्मचाऱ्यांमुळे एकाचे वाचले प्राण
दोघे जण पाण्यात बुडत असल्याचे किनाऱ्यावरील इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी एकच आरडाओरड केली. किनाऱ्यावर उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील आणि तेथील झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी (सूरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर, महेश साळवी) आपल्या जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात उडी घेतली.
बचाव पथकाने मयूर विष्णू खाडे याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दुर्दैवाने अतुल सुतार याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला होता.
प्रशासनाचा इशारा: पावसाळा जवळ येत असल्याने सध्या कोकणातील समुद्र खवळलेला आहे. २६ मे पासूनच सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांनी अनोळखी किंवा धोकादायक समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात उतरू नये आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांनी मृत अतुलच्या नातेवाईकांना दिली असून कोल्हापूरच्या सावर्डे परिसरात या बातमीमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
