महाराष्ट्र

निसर्ग अभ्यास सहलीत शालेय विद्यार्थ्यांना घडले बिबट्याचे दर्शन!

कोयना व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये विद्यार्थ्यांना थरारक अनुभव

चिपळूण : ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या पश्चिम घाटातील कोयना व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन अंतर्गत येणाऱ्या ‘रामबाण’ ट्रेल आणि जैवविविधता आणि कोयना जलविद्युत प्रकल्प दर्शन निसर्ग अभ्यास सहलीत काल (दि. १३) जिल्हा परिषद शाळा उक्ताडच्या विद्यार्थांना सायंकाळी परतीच्या प्रवासात नवजा-कामरगाव भागात वयस्क बिबट्याचे अविस्मरणीय दर्शन घडले. वन्यजीव, वनसंवर्धन विषयातील विद्यार्थ्यांच्या जाणीवा अधिक समृद्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि स्वच्छतेचे महत्त्व कळावे या हेतूने शाळेचे मुख्याध्यापक आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या सहलींतर्गत विद्यार्थ्यांनी कोयना जलविद्युत प्रकल्प स्तर ४ अंतर्गत तांबडवाडी घाटरस्त्याने प्रवास केला. ‘महाराष्ट्रातील मेळघाट (अमरावती) येथे व्याघ्र प्रकल्पांच्या निर्मितीला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झालीत. हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारलेला आहे. हा सहावा प्रकल्प आहे. यामुळे बिबटे, गवा, चितळ, सांबर व हरिण आदी प्राण्यांनाही संरक्षण मिळाले आहे. सर्वाधिक वाघ असलेला भारत हा देश आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलाच्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. येथे पर्यटनासही चांगला वाव असल्याचे ध्यानात घेऊन ‘जंगल ट्रेल’ आयोजित करण्यात येत आहेत. कोयनेच्या व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे याचे स्वरूप आहे.’ अशी माहिती या सहलीचे संकल्पक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी विद्यार्थ्यांना दिली. बापट यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे संरक्षण, संवर्धन, कचरा व्यवस्थापन आदींचेही निसर्गातील छोटी-छोटी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. सह्याद्रीत एका डोंगरावर उभे राहून दुसऱ्या डोंगरातील निसर्ग पाहाण्यासाठी आपण जात असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली.

सहलीचे मार्गदर्शक सागर जाधव यांनी विद्यार्थ्यांना समोर दिसणारा जंगली जयगड सुळका त्यापुढील वासोटा आणि पाठीमागील बाजूला दूरवर असलेल्या भैरवगड किल्याची माहिती दिली. शिवकाळात जंगली जयगड हा टेहळणीसाठी वापरला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोयना जलविद्युत प्रकल्पातील सर्जवेल, पोफळी स्वीचयार्ड आशिया खंडातील पहिले लेक टॅपिंग आदी दाखवून माहिती दिली. ‘रामबाण’ नेचर ट्रेलचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष ‘रामबाण’ स्थळी त्यांनी भगवान श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासात असताना, सीता मातेला तहान लागलेली असताना धनुष्य बाणाने तयार केलेले हे जलकुंड असल्याची स्थानिकांकडून ऐकायला मिळणारी आख्यायिका त्यांनी सांगितली. या जलकुंडातील पाणी कधीही संपत नाही. श्रीरामनवमीला येथे मोठा उत्सव संपन्न होत असतो, असेही ते म्हणाले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निसर्ग पर्यटन संकुल रासाटी येथे अरण्यराग (music of nature)ची माहिती वन्यजीव अभ्यासक सचिन धायगुडे यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वाघ, सांबर, भेकर, हनुमान वानर लांगूर, शेकरू, महाधनेश, ग्रेट हॉर्न बील, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, घुबड (spot beilled eegal owl), सुतारपक्षी (black rumped flameback), रातवा (jungle night jaar), सुभग, मलबार कस्तुर (malbar whistling thrush), तांबट (white chick barbet), पावश्या (common hawk cuckoo), रानकोंबडा (grey jungle fowl) आदींचे आवाज ऐकायला मिळाले. पांडुरंग कदम यांनी विद्यार्थ्यांना कोयना धरणाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी बिबट्या, गवा आदींसह अस्वलाची ताजी विष्ठा पाहिली. पंचधारा धबधबा आणि कोकणकडा दर्शन केले.

आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसह जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना परिसराला निसर्ग सहल अंतर्गत भेट दिली. यावेळी आम्हाला जंगलातील वनस्पती, प्राणी, त्यांचे संवर्धन आदींसह जैवविविधतेची सखोल माहिती प्राप्त झाली. प्राण्यांच्या हालचाली, लक्षणे, त्यांचे आवाज यांचा अनुभव घेता आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत सुरु असलेली जागृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आली. यासाठी व्याघ्र प्रकल्पातील संयोजकांचे आम्ही मनापासून आभारी असल्याची प्रतिक्रिया खेंड (चिपळूण) संकुलाचे केंद्रप्रमुख शेषराव गर्जे यांनी दिली.

‘एखाद्या प्राणीसंग्रहालयात जाऊन बंदिस्त प्राण्यांना पाहाणे आणि खुल्या अभयारण्यात मनुष्यवस्तीच्या जवळच्या प्रदेशात विद्यार्थ्यांना निसर्ग अभ्यास सहलीच्या निमित्ताने बिबट्याचे दर्शन घडणे हे शालेय वयातील कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आहे. अलीकडच्या काळातील मानव आणि वन्यजीव सहसंबधातील संघर्ष विचारात घेता अशा सहलीतून होणारे निसर्ग दर्शन मुलांच्या मनावर कायमचा सकारात्मक परिणाम साधणारे ठरते आहे. त्यामुळे अशा सहलींना अधिकाधिक प्राध्यान्य मिळायला हवे.’ अशी भूमिका या सहलीत सहभागी झालेले लेखक आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी मांडली.

या निसर्ग सहलीत खेंड केंद्रप्रमुख शेषराव गर्जे, मुख्याध्यापक विलास महाडीक, सीमा कदम, स्नेहा नेटके, शीतल राजे, मनीष भुरण, प्रिया जांबळे, सहलीचे संकल्पक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, सहलीचे मार्गदर्शक सागर जाधव, लेखक आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर आणि उक्ताड शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सहलीच्या यशस्वीतेसाठी कोयना व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत, उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक साळुंखे, वनक्षेत्रपाल गोडसे, वनपाल डाफळे, प्रकल्प वाहनचालक अनिकेत महाजन आदींचे सहकार्य लाभले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button