रत्नागिरीत टाटा कंपनीच्या कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

- हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
- पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही
रत्नागिरी : उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत, अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात होणाऱ्या टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन येथील चंपक मैदान येथे कुदळ मारुन तसेच कोनशिलेचे अनावरण करुन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार शेखर निकम, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक अनिल केलापूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सर्वप्रथम तिथीनुसार आज होणाऱ्या शिवजयंतीच्या उपस्थितींना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, टाटा संचलित कौशल्य वर्धन केंद्राचे 196.28 कोटी रक्कम असून त्यापैकी 165.10 कोटी टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्याकडून उपलब्ध होणार आहेत. उर्वरित 31.11 कोटी एमआयडीसीकडून दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी एमआयडीसीमार्फत 1 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरवर्षी या प्रकल्पामधून 7 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रत्नागिरी काळानुरुप बदलत चालली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लवकरच विमानतळाची सोय होणार आहे. टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक वातावरण कौशल्य प्रशिक्षण देणे सोईचे होणार आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या केंद्राचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पध्दतीने अद्ययावत केले जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीच्या नेतृत्त्वाखाली इतर उद्योग संघ आणि एमआयडीसी यांना संयुक्त उपक्रम आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधान आणि उद्योजकता निर्माण करणे सोपे जाणार आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीनंतर रत्नागिरीत हे केंद्र सुरु होत आहे, याचे श्रेय उद्योगमंत्री सामंत यांना जाते, असे सांगून ते म्हणाले पुण्यात बाणेर, कल्याण- डोंबिवली, शिर्डी येथेही हे केंद्र सुरु होणार आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक या ठिकाणीही कौशल्य केंद्र दिले जाईल. कुशल मनुष्यबळ उभारायची गरज त्यामध्ये हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे सांगून कोस्टल रोड रेवस रेड्डीला प्राधान्य दिले जाईल. पायाभूत सुविधा अतिशय उत्तमतरित्या होतील याला सर्वोच्च प्राधान्य राहील असे ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना रत्नागिरीतच शिकुन रत्नागिरीतच नोकरी मिळेल यासाठी 20 हजार रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प रत्नागिरीत होत आहेत. वर्षभरात हे कौशल्य वर्धन केंद्र देखील पूर्णत्वास येईल. नोकरीसाठी, रोजगारासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता नाही. स्कीलवर्धन केंद्राच्या प्रशिक्षणानंतर जिल्ह्यामध्येच ती पूर्ण होईल. त्यासाठी निधी देण्याचे काम दादांनी केले आहे.
खासदार श्री. तटकरे आणि जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री. खेमणार यांनी आभार प्रदर्शन केले.