लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Team RatnagiriLive
2 Min Read

बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे : डॉ. जस्मिन

रत्नागिरी, दि.16: 267 राजापूर विधानसभा मतदार ससंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॅ. जस्मिन यांनी आज कोत्रेवाडी लांजा येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेऊन मतदान करण्याबाबत आवाहन केले.

कोत्रेवाडी ग्रामस्थ मंगेश आंबेकर यांनी नियोजित घनकचरा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत तसे न केल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याबाबत निवेदन दिले होते.

या निवेदनाची दखल घेत, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांची ही बैठक आज दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालय लांजा येथे घेतली.
डॉ. जस्मिन म्हणाल्या, मतदान करणे हे स्वत:च्या हक्कासाठी असते. लोकशाहीच्या दृष्टीने मतदानावर बहिष्कार घालणे हे योग्य नाही. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला जाईल. आपल्या समस्यांचे निवारण जरुर केले जाईल. बहिष्काराचे आवाहन करणे हे आचारसंहितेच्या दृष्टीने चुकीचे आहे. मतदारांना असे चुकीचे आवाहन करुन वंचित ठेवल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल. त्याचबरोबर निवडणूक संपल्यानंतर मी स्वत: स्थळ पाहणी करुन आपण मांडलेल्या मुद्दांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करेन. निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मुक्तपणे व निपक्षपातिपणे मतदान करता यावे, हाच आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर मा. उच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्वांना बंधनकारक असेल त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा आणि मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले
बैठकीला मुख्याधिकारी लांजा हर्षला राणे तसेच पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment