दापोली : गेल्या काही दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळी दापोली तालुक्यात एकजण वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर वाहून गेलेल्या राजेंद्र कोळंबे यांचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावरच मंगळवारी सायंकाळी आढळून आला.
तालुक्यातील वणंद गावातील कांगणेवाडी येथे राहणारे राजेंद्र उर्फ राजू कोळंबे (४५) हे तेथील नदीला आलेल्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना सोमवार दि. २६ रोजी सकाळी घडली होती.
दि. २६ रोजी दापोलीत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे कोंडी नदी पुलावरून पुराचे पाणी जात होते. कोळंबे हे कांगणेवाडीतून या पुलावरून गुजरवाडीतून रोज दापोलीत कामाला ये-जा करत असत. दि.२६ रोजी दापोली शहरात रात्रपाळी करून सकाळी ते घरी परतत असताना ते पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याने बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच दापोली महसूल, दापोली पोलीस प्रशासन, गावकरी त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोळंबे यांचा मृतदेह सापडला.
