रत्नागिरीत तिरंग्याला पावसाचीही सलामी!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : यावेळी स्वातंत्र्यदिनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वरुणराजाचे दमदार आगमन झाले. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारी सकाळी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावली.

हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत विविध गृहनिर्माण सोसायटीमध्ये देखील भर पावसात तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर पुन्हा जोर धरला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी लवकरच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे काही ठिकाणी कार्यक्रमांवर थोडी मर्यादा आली, तरीही कोणाचाही उत्साह कमी झाला नाही.

स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनसाठी चिमुकल्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.

पावसाच्या धारांमध्येच तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी सर्वच आतुरतेने उभे होते. देशभक्तीच्या वातावरणात पावसानेही सहभाग घेतल्याने एक वेगळाच अनुभव सर्वांनी घेतला. पावसाची सलामी म्हणजे जणू निसर्गानेही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

​रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण

जोरदार पाऊस असूनही, रत्नागिरीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम होता. तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या राष्ट्रीय सणात सहभागी झाले होते. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे, कारण यामुळे शेतीतल्या कामांना गती मिळेल अशी आशा आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment