- नाटकाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची ठाम भूमिका
रत्नागिरी : वारकरी संप्रदायाची विटंबना करणारे ‘ईठ्ठला’ नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठल भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनीही हे नाटक कुठे सादर करू नका, असे सांगितले असतानाही नाटक सादर करण्याचा अट्टाहास केला जात आहे. या बाबत “अशी अरेरावी खपवून घेतली जाणार नाही आणि जर नाटक सादर केले; तर कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी ठाम भूमिका पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या ‘जनता दरबारा’त मांडली.

यासंदर्भात शुक्रवारी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमोल रंगयात्रीतर्फे (लांजा) सादर करण्यात आलेल्या ‘ईठ्ठला’ नाटकात वारकरी संतांच्या नावांचा गैरवापर, श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात बेभान होऊन नाचणाऱ्या वारकरी दांपत्याकडून त्यांच्याकडे अतिथी म्हणून आलेल्या स्वतःच्या मुलासह १० जणांचे होणारे खून इत्यादी वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे विविध आक्षेपार्ह प्रसंग दाखवून वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे समोर आले.
याबाबत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदन दिले असता ना. डॉ. उदय सामंत यांनी या नाटकाच्या माध्यमातून होत असलेली वारकरी संप्रदायाची विटंबना लक्षात घेऊन नाटकाच्या सादरकर्त्यांना “नाटकाचे नाव बदला, पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पना त्वरित बदला,” अशा कडक सूचना देऊन सदर नाटक तुम्हाला परत सादर करता येणार नाही, अशी समज दिली. तरीही सदर ‘ईठ्ठला’ नाटक पुन्हा विविध ठिकाणी सादर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे, अशी माहिती वारकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी आज जनता दरबारात दिली असता ना. डॉ. सामंत म्हणाले, “नाटकाचे ‘ईठ्ठला’ हे नाव तसेच वारकरी संतांची नावे असे विविध आक्षेपार्ह भाग या नाटकात असून मी नाटकाच्या सादरकर्त्यांना हे नाटक महाराष्ट्रात कुठेही सादर करू नका, असे सांगितले आहे. तरीही ते नाटक सादर करण्याचा प्रयत्न करत असतील; तर त्यांची ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी जर नाटक सादर केले; तर कायदेशीर कारवाई केली जाईल. एक हिंदु म्हणून माझी ही भूमिका आहे. मी तुमच्यासोबत आहे.”
पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी वारकरी आणि विठ्ठलभक्त यांच्या भावना दुखावणाऱ्या या वादग्रस्त नाटकाबद्दल घेतलेल्या ठाम भूमिकेचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
या वेळी लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे सर्व ह.भ.प. मनोहर तथा दादा रणदिवे, तुळशिराम मोरे, विष्णू लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे अमितराज खटावकर, भैरूलाल भंडारी, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते.
![]()
