मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न :
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला

Team RatnagiriLive
3 Min Read

रत्नागिरी : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मच्छीमार बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, आपला विकास साधावा, आपला व्यवसाय वाढवावा. आपल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी दिले.


स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर नाटयगृह येथे सागर परिक्रमा कार्यक्रम 2023 (पाचवे चरण) आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे, सहसचिव, डॉ.जे. बालाजी, श्री.पंकजकुमार,
आदि मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.रुपाला म्हणाले, मच्छिमार बांधवांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा सारख्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मच्छीमार बांधवानी या योजनांचा लाभ घ्यावा, आपला व्यवसाय वाढवावा आणि विकास साधावा.
या सागरपरिक्रमा ची सुरुवात गुजरात मधून झाली. रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आपण बेलदूर, मिरकरवाडा, मिऱ्या येथील मच्छीमारांना भेटलो, येथील सोयीसुविधा पाहिल्या. सागरी मार्गाने मच्छीमार बांधवांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, अडीअडचणी मी जाणून घेत आहे. काही नियम, अटी या मच्छीमार बांधवाच्या विकासासाठी सोयीस्कर नाहीत. या अडीअडचणी सोडविण्यासाठी देशातील सर्व राज्यामधील मत्स्यविभागाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन मच्छीमार बांधवांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्याचा जरूर प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


आपल्या सागरपरिक्रमामध्ये कोस्टल गार्ड यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या सहकार्यामुळे सागरी मार्गे प्रवास करणे अधिक सोयीचे झाले. त्यांच्या कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. या परिक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारकडून झालेल्या सहकार्यामुळे, त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे आपले मनोधैर्य वाढले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, किसान क्रेडीट कार्ड, क्यूआर कोड कार्ड, ई-श्रम कार्ड चा लाभ काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात देण्यात आला.


पालकमंत्री उदय सामंत यांनी मच्छीमारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी समुद्रमार्गे भेटायला येणारे परषोत्तम रुपाला हे पहिले केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री असल्याचे सांगून दिल्लीमध्ये गेल्यावर ते मच्छीमार बांधवांचे सर्व प्रश्न, समस्या सोडवतील असा विश्वास व्यक्त केला.
मच्छीमार बांधवानी व्यवसाय करताना आपापसात भांडून चालणार नाही. पारंपारिक व अपारंपारिक मच्छीमार यांचे प्रश्न सर्वांनी एकत्र बसून समन्वयाने सोडविणे गरजेचे आहे. सर्व बंदरांच्या डागडुजीसाठी मच्छीमारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सन 2021-22 पर्यंतचा इंधन परतावा देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांनी सर्वांचा विकास साधण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment