जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संप्रदायाच्या वसुंधरा दिंडी’चे वसईहून नाणीजला प्रस्थान

Team RatnagiriLive
3 Min Read


२१ ऑक्टोबरला पोहोचणार नाणीजला

नाणीज : ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती करीत, ‘झाडे लावा-झाडे जगवा व पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत आज वसईहून श्रीक्षेत्र नाणीजला येण्यासाठी पायीदिंडी निघाली आहे. परमवंदनीय जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित स्व-स्वरूप संप्रदायाच्या मुंबई पीठाकडून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक व परभणीहून सुद्धा अशा दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजकडे येण्यास यापूर्वीच निघाल्या आहेत.


तीनही दिंड्या मजल- दरमजल करीत निघाल्या आहेत. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी ज.न.म. स. चे प्रवचनकार पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन करत आहेत. लोकांना निसर्ग रक्षणाचे महत्व सांगत आहेत.
यादिंड्या २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५८ व्या जन्मदिन सोहळ्यादिवशी नाणीजमध्ये पोहोचतील. यातील सर्वजण वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत.


वसई (श्री क्षेत्र शिरसाड) हून आज निघालेल्या दिंडीमध्ये हजारो लोक सहभागी झाले आहेत. ही दिंडी म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी मांडलेला जागर होय. प्रथम दिंडीने वसई येथील मंदिराला ५ प्रदक्षिणा घातल्या व पुढे मार्गस्थ झाली. दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रथ आहे .त्यानंतर टाळ मृदुगाच्या गजरात, भक्तीच्या आनंदात तल्लीन होऊन दिंडीची वाटचाल सुरू झाली. हातात पर्यांवरण जागृतीचा संदेश देणारी बॅनर्स घेतलेले भाविक, मध्यभागी पालखी व लोकांच्या गर्दीत दिंडी पुढे चालू लागली आहे. सहभागी भाविकानी विशिष्ट पोशाख परिधान केलाआहे. त्यावरही पर्यावरण जागृतीचे अनेक संदेश छापले आहेत.

वसईहून मुंबई पिठाची नाणीजला निघालेली भव्य पायी दिंडी.


ही दिंडी वसई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, पाली मार्गे नाणीजक्षेत्री पोहोचणार आहे.
दिंडीतील लोक वाटेत आजूबाजूला असणाऱ्या शहर व खेड्यापाड्यांमध्ये संदेश देणार आहेत. ग्लोबल वॉर्मिग कशामुळे होते, त्याचे शेतीवर काय काय परिणाम होत आहेत. हे भावी पिढीसाठी किती हानीकारक आहे. कोणत्या कारणाने हे संकट वाढत आहे. काय केले असता ते आटोक्यात येईल याबाबत तेथील लोकांना मार्गदर्शन केले जात आहे. झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा असा संदेश दिला जात आहे. या तिन्ही दिंड्यांना ‘ वसुंधरा पायी दिंडी’ असे नाव दिले आहे.

वसईहून मुंबई पिठाची नाणीजला निघालेली भव्य पायीदिंडी.


दिंडीतील लोक केवळ मार्गदर्शन करणार नसून ते स्वतःदेखील त्याचे आचरण करणार आहेत. ते लोक स्वतःची ताटवाटी सोबत घेऊन निघणार आहेत. जेणेकरून जेवणापासून चहा, नाष्टा करण्यासाठी त्यांना प्लास्टिक अथवा कागदाचे कप व डीशेस वापराव्या लागणार नाहीत. दिंडी पुढे पुढे जाईल तसतसे मागे कचरा होणार नाही यासाठी विशेष सेवेकरी पथक या दिंडीत आहे. त्यांनी स्वच्छता सुरू केली आहे.


दिंडीसोबत यात्रेकरुंची विशेष काळजी घेण्यासाठी एक रुग्णवाहिकाही आहे. त्यात डॉक्टरांचे एक पथक सज्ज आहे. यामध्ये सर्व वयोगटांतील स्त्री-पुरूष भाविक उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यात तरुणांचा सहभाग मोठा आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment