आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी, दि. १५ : आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी सर्वांनी मतदान करावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी ‍दिली.
सर्व नोडल अधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज बैठक घेण्यात आली.

या बैठकीस पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी आपले मतदान करावे. भरारी पथकं सक्रीय ठेवा. दिवाळी मोठा सण असल्याने अधिक सतर्क बाळगून काटेकोरपणे वाहनांची तपासणी करावी. गोवा बनावटीचे मद्य, नियमापेक्षा रोखड याबाबतीत पहिल्या दिवसापासून काटेकोरपणे तपासणी करावी. भरारी पथक, सिमा भागातील तपासणी नाके या ठिकाणी सीसीटिव्ही बसवावेत.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. घाट मार्गातील सीमा भागात तपासणी पथकांमध्ये राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, जीएसटी विभागाचे प्रतिनिधी असावेत. तपासणी नाक्यांपासून काही अंतरावर यु टर्न घेऊन माघारी वळणाऱ्या वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करत सविस्तर माहिती दिली. आचारसंहितेत काय करावे, काय करु नये, विविध नोडल अधिकारी कार्य, कर्तव्य, जबाबदारी यांचा यात समावेश होता. बैठकीला विविध नोडल अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment