कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्रशेठ घरत

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : “कामगारांच्या अनेक विविध संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर भाजप सरकार आता वरवंटा फिरवत आहे, हे अत्यंत संतापजनक आहे. सरकार गेल्या अनेक वर्षांपासून भांडवलदारांचाच विचार करतेय. कामगार, शेतकरी देशोधडीला लागले तरी चालतील, अशीच भूमिका घेतल्याचे चित्र सध्या देशभर दिसत आहे. महागाई गगनाला भिडलीय, त्यामुळे कामगाराला घर चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे किमान वेतन ३० हजार रुपये हे मिळायलाच हवे. परदेशात शिक्षण, मेडिकल सुविधा मोफत मिळतात. आपल्याकडे सर्वसामान्य कामगाराचा मुलांचे शिक्षण आणि आजारपण यावर प्रचंड खर्च होतोय. कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक आहे, त्याला जर तुम्ही उपाशीपोटी ठेवत असाल तर ही सत्ता उलथवल्याशिवाय सर्वसामान्य माणूस गप्प बसणार नाही. दिबांचे नाव जर प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले नाही तर भूमिपुत्र पेटून उठतील, मग कळेल आगरी-कोळी समाज काय असतो,’’ असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत जेएनपीटी परिसरात कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

“९ जुलैचा देशव्यापी संप हा ऐतिहासिक होणार आहे. गेली अकरा वर्षे मोदी सरकार सत्तेवर आहे. त्यांनी जी धोरणे अवलंबिली आहेत, ती कामगार वर्गाला मारक आहेत, कामगारांना गुलामगिरीत लोटणारी आहेत. संघटना स्थापन करणे, चालवणे, हे फार कठीण होणार आहे.

सध्या अक्षरशः हुकूमशाही चालवली जात आहे, हे निंदनीय आहे. हे सरकार फक्त भांडवलदारांचे आहे,’’ असे काॅ. भूषण पाटील यावेळी म्हणाले.
त्यामुळे ९ जुलैचा देशव्यापी संप शेतकरी आणि कामगार रस्त्यावर उतरून यशस्वी करतील, असा आशावाद सर्वच कामगार नेत्यांनी केला.

यावेळी जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते रवी घरत, संतोष घरत, रमेश ठाकूर, मधुसूदन म्हात्रे, वैभव पाटील, किरीट पाटील आदी मान्यवर आणि शेकडो कामगार उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment