आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे बँकांचे कामकाज हवे : पालकमंत्री उदय सामंत

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी, दि. 26 : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे काम सर्व बँकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.


रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक दर्शन काणसे, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप आदींसह आंबा बागायतदार उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, बागायतदारांना 2 लाखांपर्यंत कर्ज देताना तारणची गरज नाही. जिल्ह्यातील बहुतांश आंबा बागायतदार यांना पीक कर्जाकरिता 2 लाखापेक्षा अधिक रक्कम आवश्यक असते. बँकांनी करारावरील बागांमधील आंबा पीक विचारात घेऊन पीक कर्ज मंजूर करावे आणि ज्या आंबा बागायतदारांकडून आंबा बाग कराराने घेतली आहे. त्याबाबतचे करारपत्र नोंदणीकृत (Registered) घेण्याऐवजी नोटरीसमोर केलेले (Notarised) करारपत्र स्वीकारण्यात यावे. तसेच पीक कर्ज नुतनीकरणासाठी प्रक्रिया शुल्क आकारताना अग्रणी बँकेनुसार इतर बँकांनी शेतकऱ्यांना प्रोसेसिंग फी आकारावी, असे निर्देश दिले.

यावेळी शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी सर्व बँकांनी सिबिल स्कोर विचारात न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबाबत सर्व बँकर्सने सकारात्मक तयारी दर्शविली. आंबा निर्यातीवरील ड्युटी रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.


पंतप्रधान सन्मान योजना, नमो सन्मान योजना संदर्भात आढावा घेतला. १३ फ्लॅगशिप योजनांचा पुढील दौऱ्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
000

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment