खेडमध्ये भाजपाची तिरंगा रॅली उत्साहात

Team RatnagiriLive
2 Min Read
  • भारत माता की जय, वंदे मातरम्’ घोषाने खेड शहर दुमदुमले, रेकॉर्ड ब्रेक गर्दी

खेड : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ९.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज आणि भारत माता की जय.. वंदे मातरम.. च्या जयघोषाने संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेले. या तिरंगा रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खेड तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक, युवती, शहरातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांमध्ये रॅलीबाबत प्रचंड उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना पाहायला मिळाली. रॅली अत्यंत शिस्तबद्ध दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, मा.आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. खेडमधील नागरिकांनी तिरंगा रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपल्या शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दाखवणारा आहे. तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे, असे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी सांगितले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही भव्य तिरंगा रॅली भारत माता की जय’ आणि वंदे मातरमच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment