प्रस्तावित रिफायनरीसंबंधी जिल्हा प्रशासनाची ग्रामस्थांशी चर्चा सुरूच

Team RatnagiriLive
1 Min Read

सर्वेक्षणाचे काम शांततेत; कोणताही अनुचित प्रकार नाही

रत्नागिरी : मौजे बारसू, ता. राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावित गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम मंगळवार, 25 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे. आजही दि.26 एप्रिल 2023 सकाळी ठीक 7.00 वाजता सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. जिल्हा प्रशासनाची ग्रामस्थांसोबत सतत चर्चा सुरु आहे. दिवसभर सर्वेक्षणाचे काम शांततेत सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी आज (26 एप्रिल रोजी) सर्वेक्षण ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे भेट घेऊन त्यांच्याशी प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर जमलेल्या ग्रामस्थांचीही समक्ष भेट घेवून चर्चा केली.


या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गुरुवार, दि. 27 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून प्रकल्पाबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment