राजवाडीत हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

Team RatnagiriLive
1 Min Read

संगमेश्वर : कोरोना काळात तीन ते चार वर्षे महामारीमुळे शालेय क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु सध्या या महामारीतून मुक्त होऊन मानवी जीवन पूर्वपदावर आल्याने दरवर्षी संपन्न होणाऱ्या शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे नियोजन यावर्षी करण्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेने ठरवले असल्याने संगमेश्वर तालुक्यातील तुरळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन ब्राह्मणवाडी येथे राजवाडी सरपंच सविता देवरुखकर व तुरळ सरपंच सहदेव सुवरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना तुरळचे केंद्रप्रमुख दिपक यादव म्हणाले, की विद्यार्थी व्यक्तिमत्व घडविण्यात मैदानी खेळाचे अत्यंतिक महत्त्व असून विद्यार्थ्याना खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी अशा जि.प.च्या उपक्रम व स्पर्धेतून महत्त्वाची संधी मिळते. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते. स्पर्धेत भाग घेणारे संघ त्यांचे खेळाडू उपलब्ध वेळ इत्यादीची सांगड घालून विद्यार्थी खेळाडूंनी खेळामध्ये यशस्वी व्हावे व आपल्या शाळेचे नाव लौकिक करावे असे आवाहन केंद्रप्रमुख दिपक यादव यांनी केले.

याप्रसंगी राजवाडी सरपंचा सविता देवरुखकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सानिका गोमाणे, तुरळ सरपंच सहदेव सुवरे, पोलीस पाटील विलास राऊत, माजी सरपंच संतोष भडवळकर, बाबा कलवारी, ग्रामस्थ, पालक केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते. यावेळी देवरूखकर, भडवळकर, सुवरे, राऊत यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. तसेच सूत्रसंचलन दीपक महाडीक यांनी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment