‘मॉक ड्रिल’ होणाऱ्या देशभरातील २४४ शहरात रत्नागिरीचा समावेश

- महाराष्ट्रात उद्या १६ ठिकाणी सुरक्षा सतर्कता प्रात्यक्षिक
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली आहे. त्याची सुरुवात ७ मे रोजी होणार आहे. देशभरातील २४४ ठिकाणी युद्धादरम्यानचे ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृह सचिवांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या ७ मे रोजी होणाऱ्या म़़ॉक ड्रिल होणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात १६ ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.
देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण दिले जाते. ( कारभार ) युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये, याची माहिती दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल, याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलमध्ये करण्यात येते.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर देशभरातील २०० हून अधिक शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शहरांना तीन श्रेणीत विभागण्यात आले आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यातील जवळपास सगळ्याच शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मॉक ड्रिल ?
राज्यात मुंबईसह इतर ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. लष्कर आणि भारताच्या दृष्टीने ही शहरे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे शत्रू राष्ट्रांकडून या शहरांना देखील लक्ष्य करण्यात येऊ शकते.
केंद्रीय गृहविभागाने जारी केलेल्या यादीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.( कारभार ) केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थळ-वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
७ मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्सचं ‘मॉक ड्रिल’ करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थ्यांना संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मॉक ड्रिलमध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे.