वारकरी संप्रदायाचे विकृत सादरीकरण करणाऱ्या ‘ईठ्ठला’ नाटकावर शासनाने बंदी घालावी; अन्यथा राज्यभर आंदोलन

- हिंदु जनजागृती समितीचा इशारा
रत्नागिरी, २८ फेब्रुवारी – रत्नागिरी येथे ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेले ‘ईठ्ठला’ हे नाटक वारकरी संप्रदायाचे विकृत सादरीकरण करणारे आणि समस्त विठ्ठल भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याने या नाटकावर राज्य शासनाने तात्काळ बंदी घालावी आणि मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतून हे नाटक बाद करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार, पालकमंत्री श्री. उदय सामंत, आमदार श्री. किरण सामंत यांना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या बाबत उचित कार्यवाही न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलनाचा इशाराही हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.
रत्नागिरी येथे नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सकाळी ११.३० च्या सत्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात निर्माता श्री. जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज निर्मित श्री. अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक अमोल रंगायत्रीतर्फे सादर करण्यात आले. हे नाटक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पाहिले असता हे नाटक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मविरोधी विकृती पसरवण्याचा प्रयत्न करणारे, धार्मिक भावना दुखावणारे, वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे, समाजात तेढ आणि असंतोष निर्माण करणारे असल्याचे निदर्शनास आले.
वारकरी दिंडीची वर्षानुवर्षे सोय करणारे वारकरी दांपत्य पती तुका, पत्नी जना आणि मुलगा नामा यांची कथा सादर करताना मुखाने पांडुरंगाचे सतत नामस्मरण करणारा, सर्व काही पांडुरंगाच्या इच्छेने होईल, असा पत्नी जनाला सतत उपदेश करणारा पती तुका पत्नीच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे आलेल्या ९ निष्पाप अतिथींचे खून करतो, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यापारी निजलेला असताना त्याचा तुका फरशीने खून करत असताना बाहेर व्यापाऱ्याने दिलेली चटणी भाकरी पत्नी जना निरढावल्याप्रमाणे खात बसते, स्वतःच्या मुलाचाच खून करते, असे दाखवले आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांचा हा उपहास असून विठ्ठल भक्तीविषयी गैरसमज व संशय निर्माण करणारे हे नाटक अहिंसा, भक्ती, मानवतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या पूर्ण विरोधात असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र नाट्य परिक्षण मंडळाच्या नियमानुसार समाजात असंतोष, धार्मिक भावना दुखावणारे, सामाजिक सलोखा बिघडवणारे नाट्यप्रयोग सादर करण्यास मनाई असल्याने ‘ईठ्ठला’ या नाटकावर राज्य शासनाने तात्काळ बंदी आणावी आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतून हे नाटक बाद करावे. भविष्यात हिंदु धर्म, हिंदूंचे धर्मग्रंथ, संत, वारकरी संप्रदायासहित सर्व संप्रदाय, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक यांचे विडंबन अथवा विकृत स्वरूपाचे सादरीकरण करणाऱ्या नाटकांना परवानगी देण्यात येऊ नये. या बाबत उचित कार्यवाही राज्य शासनाने करावी; अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.





