रत्नागिरी : जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याने, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला भारतातील पहिल्याच ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त प्रकल्पाचा शुभारंभ रायणमळी, नाचणे येथे आज जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, हा उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी आदर्श मॉडेल ठरणार आहे. रत्नागिरीच्या सागरी सुरक्षेला या प्रकल्पामुळे एक नवे ‘कवच’ प्राप्त होणार आहे. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरेल व भविष्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
