स्वामीराज प्रकाशनतर्फे
अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा

Team RatnagiriLive
2 Min Read

चाळीस हजार रुपयांची पारितोषिके

मुंबई( सुरेश सप्रे) : स्वामीराज प्रकाशन या संस्थेने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या ‘ मराठीचा पाठ ‘ या कवितेवर आधारित अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २११११, द्वितीय १११११ आणि तृतीय पारितोषिक ७७७७ रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे.


स्वामीराज प्रकाशन संस्थेतर्फे दर महिन्याच्या २७ तारखेला ‘ मराठी आठव दिवस ‘ हा उपक्रम साजरा करण्यात येतो. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा या उपक्रमाचा हेतू असून आतापर्यंत कोल्हापूर, कणकवली, गोवा, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, ठाणे, कल्याण, नालासोपारा, कुडाळ, बेळगाव आदी ठिकाणी कार्यक्रम सादर झाले आहेत.
‘ मराठी आठव दिवस ‘ च्या वर्ष पूर्ती निमित्त संस्थेने विविध संकल्प हाती घेतले आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट दिले जाणार आहे. शिवाय एका अभिनव एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.


ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून प्रवेश शुल्क नाही. एकांकिका १ जून २०२३ पर्यंत PDF स्वरूपात swamirajprakashan@gmail.com यावर पाठवायची आहे.


नाट्य क्षेत्रातील नामवंत लेखक , दिग्दर्शक या स्पर्धेचे परीक्षण करतील. अशोक नायगावकर यांची कविता मिळविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक ज्येष्ठ कला दिग्दर्शक सुनील देवळेकर यांच्याशी ८८७९८१३९०५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
या अभिनव स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि ती यशस्वी करावी, असे आवाहन स्वामीराज प्रकाशन या संस्थेच्या प्रमुख रजनी राणे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment