मुंबई ते दापोली सायकल प्रवासात पर्यावरणपूरक होळीची जनजागृती

Team RatnagiriLive
2 Min Read

दापोली : कोकणात शिमगा होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते, वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत लोकं गावी पोहोचतात. दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड व किरण भुवड यांनी अंधेरी मुंबई ते दापोली असा २५० किमीचा प्रवास करण्यासाठी सायकलची निवड केली. या सायकल प्रवासात त्यांनी पर्यावरणपूरक होळी उत्सव याबद्दल जनजागृती केली.

दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सुरज भुवड (वय २५) व किरण भुवड (वय १८) शिक्षणानिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. हा २५० किमीचा सायकल प्रवास सुरज व किरण यांनी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. २३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता अंधेरीहून सुरु झालेला सायकल प्रवास दुसरे दिवशी सकाळी १० वाजता आंबवली दापोली येथे संपला. या खडतर सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पा गोष्टी झाल्या. पर्यावरण पूरक होळी, रंगपंचमी उत्सव हा संदेश घेऊन निघालेल्या त्यांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या त्यामुळे सर्व क्षीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि अजून स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे दोघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनले आहे, अनेक वर्षांपासून ते आजारी पडले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामदेवताची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरुप झाला असे त्यांचे मत आहे. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी असे त्यांनी आवाहन केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment