दिल्लीतील राष्ट्रीय आपत्तीविषयक परिषदेसाठी महाराष्ट्रातून एकमेव देवरूख नगराध्यक्षांची निवड

Team RatnagiriLive
1 Min Read

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून आयोजन

देवरूख (सुरेश सप्रे) : दि. 10 व 11 मार्च 2023 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी ( NPDRR) प्लॅटफॉर्मवर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ULB) दहा अध्यक्षांचे नामांकन भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. त्यामध्ये देशातील दहा राज्यांमधील प्रत्येकी एक अशा दहा नगर पालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव देवरुख नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेटये यांची निवड झाली आहे.


दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष माननीय गृहमंत्री श्री अमित शहा असून त्यांचेही या परिषदेस मार्गदर्शन लाभणार आहे.
या राष्ट्रीय परिषदेचे हे तिसरे सेशन असून पहिले सेशन 2013 साली तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री मनमोहन सिंग यांच्या उपस्थीतीत पार पडले होते. तर दुसरे सेशनचे उद्घाटन 2017 साली तत्कालीन गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या शुभहस्ते झाले होते.


नैसर्गिक आपत्ती मधून होणारी हानी कमीत कमी व्हावी याकरिता येणाऱ्या काळात अनेक उपाययोजना शासन स्तरावरून केल्या जात आहेत त्याबाबतचे नियोजन व त्याचा प्रचार प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावा या उद्देशाने सदरची परिषद आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मँणाल शेट्ये यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment